ताज्याघडामोडी

सागरगडच्या पायथ्यावरचे सिद्धेश्वर देवस्थान

सागरगडच्या पायथ्यावरचे सिद्धेश्वर देवस्थान

—-रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेला सागरगड आणि त्या पायथ्याशी वसलेले सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक ज्वलंत अध्याय आहे. या मंदिराचा इतिहास थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणी आणि लढाऊ कालखंडाशी जोडलेला आहे. बहामनी राजवटीत बांधलेला हा प्राचीन किल्ला इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यात सामील केला. असे मानले जाते की, याच काळात महाराजांनी या ठिकाणी एका भव्य मंदिराची उभारणी केली असावी. मात्र, स्वराज्याच्या प्रवासात अनेक कठीण प्रसंग आले. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक पुरंदरच्या तहात इतर २२ किल्ल्यांसोबत सागरगड देखील मुघलांच्या ताब्यात गेला. हा स्वराज्यासाठी मोठा धक्का होता, परंतु महाराजांचा जिद्द आणि पराक्रम अफाट होता. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी इ.स. १६७० मध्ये पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याचा भगवा पुन्हा एकदा तिथे डौलाने फडकवला.
—-सिद्धेश्वर मंदिराच्या सानिध्यात असलेला हा किल्ला पुढे अनेक संघर्षांचा साक्षीदार राहिला. छत्रपतींच्या निधनानंतरच्या काळात जेव्हा जंजिऱ्याच्या सिद्धीचे प्राबल्य वाढले, तेव्हा या परिसरात मोठी पडझड झाली. सिद्धीच्या आक्रमक आणि विध्वंसक धोरणामुळे महाराजांच्या काळात बांधलेले हे भव्य मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले असावे, अशी दाट शक्यता वर्तवली जाते. याच विध्वंसाच्या खुणा म्हणून मंदिरासमोरील नंदीची मूर्ती देखील उपटून जवळच असलेल्या तलावात फेकून दिली असावी, असे मानले जाते. पुढे हा किल्ला सिद्धी, आंग्रे आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
—-मंदिराच्या जिर्णोद्धाराबाबत एक लोककथा प्रचलित आहे. एका व्यापाऱ्याने संततीप्राप्तीसाठी सिद्धेश्वराच्या चरणी नवस केला होता. सिद्धेश्वराच्या कृपेने त्या व्यापाऱ्यास पुत्रप्राप्ती झाली, तेव्हा त्याने कृतज्ञता म्हणून या पडझड झालेल्या मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि मंदिरासमोर एक सभामंडप बांधला. अनेक दशके या मंदिरात नंदीची मूर्ती नव्हती. परंतु, काही वर्षांपूर्वी जेव्हा मंदिर परिसरातील तलावाची स्वच्छता आणि गाळ काढण्याचे काम सुरू झाले, तेव्हा तलावाच्या तळाशी एक अखंड पाषाणातील प्राचीन नंदीची मूर्ती सापडली. हीच ती मूळ मूर्ती असावी जी आक्रमकांच्या काळात विस्थापित करण्यात आली होती. आज ही मूर्ती पुन्हा मंदिरात एका चौथऱ्यावर सन्मानाने प्रस्थापित करण्यात आली आहे.
—-मंदिराची सध्याची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागांत विभागलेली आहे. खंडाळे गावातून सुमारे अर्ध्या तासाची पायऱ्यांची चढण चढून गेल्यावर या पवित्र स्थानी पोहोचता येते. मंदिराचा सभामंडप हा अलिकडच्या काळातील बांधकामाचा भाग असून तो बंदिस्त आहे. सभामंडपाच्या पुढे गेल्यावर अंतराळ लागते, जिथे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. उजव्या बाजूच्या कोष्टकात शेंदूरचर्चित चतुर्भुज गणपतीची मूर्ती आहे, जिच्या हातात पद्म, शस्त्र आणि मोदक असून ती अभय मुद्रेत आहे. डाव्या बाजूच्या कोष्टकात एक वीरगळ शिल्प कोरलेले दिसते, जे त्या काळातील पराक्रमाची आठवण करून देते. गर्भगृहात जमिनीच्या मध्यभागी ‘स्वयंभू शिवपिंडी’ विराजमान असून त्यावर पितळी नाग छत्र धरून उभा आहे. या पिंडीवर सतत जलाभिषेक करण्यासाठी तांब्याचे पात्र टांगलेले असते.
—-हे मंदिर केवळ इतिहासाचा वारसा नसून निसर्गसौंदर्याने नटलेले एक पर्यटन स्थळही आहे. पावसाळ्याच्या दिवसांत मंदिराशेजारी कोसळणारा सिद्धेश्वर धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते, ज्याचे नियोजन स्थानिक आगरी-कोळी बांधव अत्यंत श्रद्धेने करतात. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि इतर पवित्र दिवसांत भाविकांची येथे मोठी गर्दी असते. अलिबागपासून अवघ्या ४-५ किमी अंतरावर असलेले हे मंदिर शांतता, भक्ती आणि पराक्रमी इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *