‘जिंदल विद्या मंदिर, साळाव’चे बारावी परीक्षेत दैदिप्यमान यश; १०० टक्के निकालाची परंपरा कायम

रेवदंडा | महेंद्र खैरे : जिंदल विद्या मंदिर, साळाव या विद्यालयाने सीबीएसई इयत्ता बारावी परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेत स्वयंम वाकडे याने ८६.४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. इबाद मुकादम याने ८५.७ टक्के, तर कृष्णा दिवेकर हिने ७४ टक्के गुण मिळवत विशेष यश प्राप्त केले. विज्ञान शाखेत सोहम घरत याने ७९ टक्के गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. तसेच अन्वेशा भट्टाचार्य हिने ७८ टक्के आणि इस्माईल मुकादम याने ७६.८ टक्के गुण संपादन करून विद्यालयाच्या यशात भर घातली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. मुकेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, “विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे.”
उपप्राचार्य श्री. मंगेश बमनोटे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे यश असून त्यांनी शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पंकज मलिक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “शैक्षणिक यशासोबतच विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे.”
जे. ई. टी. प्रमुख डॉ. श्री. भावेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हटले की, “जिंदल विद्या मंदिर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.”
विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशामुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


